सोमवार, ५ मार्च, २०१८

#PaytoProfessor: Part VIII " शिक्षक आजच्या जगाचा, पगाराविना भिकारी"

प्रती,
परमेश्वर,
साष्टांग नमस्कार,

आज तुमच्या दगडूशेठच्या मंदिरात आपणास भेटायला आलो होतो. संकष्टी असल्यामुळे कदाचित तुम्ही बिझी असणार लोकांची गाऱ्हाणी ऐकून घेण्यात त्यामुळे आपल्यासोबत सविस्तर बोलता आले नाही. एवढ्या लोकांनी आज तुम्हाला भेट दिली असेल त्यामुळे मी कोण ते अजून ओळखले नसल्यास एक खूण सांगू का? पांढऱ्या गांधी टोप्या घालून २०-३० लोकांची रांग आली होती पहा ज्यांवर 
"आम्ही बिनपगारी - आम्ही कर्जबाजारी"
"२५ वर्ष्यांची नवलाई - शिक्षकांना पगार नाही"
"गाजर नको-पगार द्या"
वगैरे वगैरे स्लोगन्स लिहिलेले होते... आठवलं ना,
हां त्यातलाच मी एक. 
  
आपल्या विविध मनाण्यांसाठी आंदोलनकर्त्यां शिक्षकांनी
 आज श्रीमंत दगडूशेठ गणपतीला साकडे घातले.   
एरवी मी काही ज्यास्त वेळा तुझ्या दारी आलो नाही. शेवटचं आलो होतो तेव्हा सिंहगड मध्ये जॉब मिळाला म्हणून पेढे  घेऊन आलो होतो मी. दहावी, बारावी, CET, BE, GATE, M.Tech करून नंतर डेमो, इंटरव्हिव  वगैरे किती उचापती केल्यानंतर हा जॉब मला मिळाला होता याची कल्पना तुला असेलच. कारण प्रत्येक परीक्षेवेळी मी तुझी आठवण नक्की काढली होती. तुही बऱ्यापैकी माझे ऐकून घेतोस कि काय कोणास ठाऊक.. कारण आजपर्यंत अपेक्षेएवढे मिळाले नसले तरी माझ्या प्रयत्नांच्या दृष्टीने योग्य तेवढे मिळाले हे मी आजिबात  नाकारत नाही. 

जॉब बद्दल कुरकुर नाहीये माझी.. 
शिक्षकच होणे माझे स्वप्न जरी नव्हते तरी आता मला माझे प्रोफेशन आवडते. समाधानही मिळते. महत्वाचे म्हणजे चारित्र चांगले राहते व विद्यार्थ्यांकडून रिस्पेक्ट जो मिळतो त्याचा आनंद तर वेगळाच आहे. 

पण गेल्या दोन-अडीच महिन्यांपासून मी शिकविण्याचे बंद केले आहे. कारण तुला माहित असेलच. पण फक्त १६ महिन्यांपासून पगार झाला नाहीये म्हणून शिकवत नाहीये हे साफ खोटे आहे. असं असते तर पाच वर्ष्यापुर्वीच जेव्हा उशिरा पगार करण्याची पद्धत सुरु झाली तेव्हाच बंद केले असते. किंव्हा  दोन-तीन वर्ष्यांची प्रोफेशनच बदलले असते. पण मला माझे काम आवडते, शिकवणे आवडते, मग त्यासाठी थोड्या आर्थिक खस्ता खाल्य्या तरी विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्ह्णून मी शिकवणे चालूच ठेवले. 

पण आता परिस्थिती बदलली आहे. शैक्षणिक सेवा करण्याची संधी तू ज्या संस्थाचालकांना दिली होतीस त्यांचा आता हेतूच बदलला आहे. कदाचित संस्था सुरु करताना त्यांचा उद्देश खरंच शिक्षणाला सर्वोच्च स्थानी ठेऊन त्याची सर्वतोपरी सेवा करणे हाच असेल म्ह्णूनच तू त्यांची एवढी साथ दिलीस आणि इतकी मोठी संस्था उभी झाली. आज मात्र त्यांच्यातला सारथी माणूस जागा झाला आहे व ८०००० विद्यार्थ्यांचे भविष्य व ८००० लोकांची घरे रस्त्यावर येण्याची वेळ आली आहे. 

प्राध्यापकांना आज फुटपाथवर यावे लागले न जानों
भविष्यात अजून काय वाडून  ठेवले आहे 
आली आहे कसली म्हणतोय.. 
सकाळपासून फुटपाथवरच बसून होतो. 
आमची सहनशक्ती कितीही असेल तरी आमच्या पगाराच्या जीवावर घरातील अजून ४ जणांचे पोट भरतो आम्ही. मागे-पुढे जर कोणीच नसते तर आयुष्यभर सेवा म्हणून शिक्षकी पेशा पत्करला असता. 

आणि हो १६ महिने सहन केलेच ना आम्ही, आमच्या घरच्यांनीही सहन केले. आता मात्र सहन होत नाहीये. तुझ्याकडे येण्या आधी आम्ही सगळया सरकारी संस्थांच्या लोकांसमोर आमचे मागणे मांडून आलो आहोत. पण शेवटी तीही माणसेच.. सोयीसुविधा आणि प्रशासनाच्या नावाखाली अशी व्यवस्था त्यांनी उभारली आहे कि मूळ प्रश्न सोडवणे बाजूला राहून एकत्र ते लोक आपली जबाबदारी हटकून देतात किंवा यातून आपला काय स्वार्थ साधता येतो हे पाहतात. म्हणून शेवटी आता तुझ्याकडे आलोय... 

सकाळी त्या फुटपाथवर आमच्या सोबत, अगदी जवळच एक भिकारीही होता. अगदी निवांतपणे लोळत होता. त्याला पाहून माझे मन भरून आले. दोघांमध्ये काहीच फरक राहिला आहे असं वाटत नव्हते. फक्त माझे कपडे नीटनेटके होते इतकेच. पण अश्या परिस्थितीतही त्याच्या चेहऱ्यावर भविष्याची काही चिंता वाटत नव्हती. आजचा दिवस तो माझा म्हणून जगत  आहे असे वाटत होते. काही खायला मिळाले तर ठीक नाहीतर उपाशी तर तो रोजच असतो. कपडे इमेज वगैरेचे काही देणेघेणे नाही.. मुक्ती सगळ्यांपासून... 

आम्ही मात्र आमच्याकडे दयेने कोण पाहत आहे का? कोणी आमचे म्हणणे, आमचे दुःख ऐकून घेण्यासाठी उत्सुखं आहे का हेच आपल्या केविलवाण्या चेहऱ्याने पाहत होतो. 

आमच्या बोलण्यात मुकेपणा आला आहे कि काय जे कोणालाच नीट ऐकू जात नाहीये 
कि सगळा समाज, सगळ्या संस्था, सर्व लोक जे जबाबदार आहेत त्यांच्या ऐकण्यात बहिरेपणा आला आहे..

आमच्या मागण्या रास्त  नाहीयेत  कि आता माणसांकडे करुणाच राहिली नाहीये..

आमचे प्रयन्त निष्फळ आहेत कि आमचा प्रश्नच नगण्य आहे..
हे ज्यामुळे कुठेच-कोणालाच-काहीच फरक पडताना दिसत नाहीये..

शेवटी म्हणून आता तुझ्या दारी जावे म्हणून आलो होतो. एवढ्या गर्दीत तुला ऐकू आले कि नाही कोणास ठेवून पण आमच्या प्रार्थनेत आम्ही तू लगेच आमचा सगळा पगार आम्हास मिळवून द्यावा अशी अपेक्षा केली नाही ते तर आमचे संस्थाचालकच करतील. पण आम्ही सर्व लोकांनी प्रार्थना केली कि या सर्व संस्थाचालकांना सद्बुद्धी दे कि जे काही पैसे हे लोक स्वतःच्या सार्थसाठी वापरत आहेत ते पालकांनी आपल्या पोटाला चिमटा काढून आपल्या मुलांच्या भविष्यासाठी ठेवले आहेत व त्यावर फक्त ८००० लोकांचे पोट  नसून ८००० कुटुंबांचे अवलंबून आहे. त्यांनी एवढे कष्ट घेतले त्यामुळे त्यांनी त्याची मलई खावी आत आमचे पाहू म्हणणे नाही पण शिक्षकांच्या आतड्याना कोरड पडे पर्यंत त्यांनी उच्छाद मांडला असेल तर भविष्यातील पिढ्यामध्ये कोणीही शिक्षक होण्यास तयार होणार नाही याची आम्हाला शिक्षक म्हणून भीती वाटते.

तुझ्या समोर ठेवलेल्या दानपेटी मध्ये टाकण्यासाठी आमच्याकडे पैसे नाहीत. म्हणून जाता जाता त्यात आम्ही आतापर्यंत मिळवलेल्या सर्व डिग्री सर्टिफिकेटची कागदे टाकून जात आहे. त्यांची आता गरज उरली नाही. कारण जीवन जगण्यासाठी फक्त एवढी  सर्टिफिकेटची हि कागदेच कामाला येतात यावरून आमचा विश्वास उडाला आहे.

संघर्ष मात्र आम्ही शेवटपर्यंत करत राहू...
शिक्षकांना पुन्हा प्रतिष्ठा मिळवून देणे हेच आमच्या आंदोलनाचे अंतिम धेय्य आहे,
मग ते तुझ्या आशीर्वादांसोबत किंवा त्याच्या शिवाय..

पुन्हा एकदा नमस्कार..!

तुझाच 
त्या गांधीटोपी वाल्यांपैकी कोणीही एक शिक्षक  

   
      

गुरुवार, १ मार्च, २०१८

#PaytoProfessor : Part-VII "#प्रेसिडेंट सर - आज खुश तो बहोत होगे तुम "

#MurderofTeachingFraternity 

आदरणीय प्रेसिडेंट सर,
सस्नेह दंडवत, 
(फक्त नमस्कार आपणास कमीपणा वाटला असता म्हणून झोपून दंडवत घालतोय)

थोड्याच वेळापूर्वी होळीच्या भोवतीने बोंबलणाऱ्या लहान पोरांना पाहताना गेल्या तीन महिन्यातील सिंहगडच्या प्राध्यापकांची अवस्था आठवली म्हणून व काल आणि आज आम्ही आपल्या फार्म हाऊसवर आपणास भेटायला होतो पण आपण भेटला नाहीत म्हणून सरळ पत्रच  लिहितोय.

खूपच सुरेख बांधलाय हो फार्म हाऊस.. NDA च्या गेटवरच्या आर्मीच्या लोकांना आम्ही चक्क खोटे सांगून आत आलो की आम्ही मातेच्या मंदिरात जाण्यासाठी आलो आहोत ते. नाहीतर उन्हात फिरून काळपटलेल्या चेहऱ्याने त्या गंजक्या स्पेण्डर वरून  तुम्हाला भेटण्यासाठी चाललो आहोत असं जर त्या आर्मीवाल्याना सांगितले असते तर तिथेच त्यांनी चोर समजून चोप दिला असता.

आम्ही आलोत तेव्हा तुम्हाला तुमच्या सिक्युरिटी गार्डने आपणास बहुदा सांगितले असावेच. पण तुम्ही आत बोलावले नाहीत. कदाचित अचानक येणारे पाहुणे तुम्हाला आवडत नसावेत. त्यामुळे आम्ही बाहेरच उभे राहिलो.

आपल्या फार्म हाऊसच्या भिंती किती उंच आहेत सर. वर चढून पाहता येणे शी शक्य नाही. कॅम्पाऊंट वॉलच्या फटींमधून आम्ही थोडा डोकावण्याचा प्रयत्न केला तेव्हा आम्हाला आपला आलिशान बंगला, आलिशान गाड्या, सुंदर गार्डन आणि हो महत्वाचे म्हणजे पेट हाउस ही दिसले. त्या पेट हाऊस मध्ये नक्की कोणता प्राणी तुम्ही पाळला आहे ते काही पाहायला मिळाले नाही मात्र दोन-तीन प्राणी बाहेर हुंदडताना दिसली पण ती माणसांसारखीच वाटत होती. पाठीमागे स्विमिंग पूल आहे असेही कळाले पण पाहता आले नाही. बरे झाले तुम्ही स्विमिंग पूल पुढे बांधला नाही ते नाहीतर माझ्यासारख्याला पोहल्यावाचून राहवले नसते (पगार नाही कमीतकमी एंटरटेनमेंट तरी झाली असती..!) 

आर्मी च्या संरक्षणात असतानाही आपण 10-12 बॉडीगार्ड व सेक्युरिटी गार्ड पण कामाला ठेवलेत. त्यात आणखी भर म्हणून कि काय बाहेर पोलिसांची तुकडीही आली होती . आम्ही आता पर्यंत असे समजत होतो की एवढे संरक्षण फक्त राष्ट्रपतींना असते की काय. पण तुमची जहांगीर पाहून उर अभिमानाने भरून आला कि आमचे प्रेसिडेंट देशासाठी किती महत्वाचे आहेत ते पहा. (8000 लोकांची उधारी असेल तेव्हा एवढी सिक्युरीटी लागणारच पण असो)

कर्मवीर भाऊराव पाटलांची रयत ही केवढी मोठी संस्था.. जर सिंहगडचे संस्थापक NDA रोड वर फार्म हाऊस बांधू शकतात त्या हिशोबाने तर भाऊराव पाटलांनी तर व्हाईट हाऊस मध्ये राहायला पाहिजे होते असा एक विचार मला मनात येऊन गेला. पण पैश्यांचा योग्य वापर कसा करावा हे मी आपणाकडून शिकलो (भले मग ते पैसे कोणाचेही असोत)

या दोन-तीन महिन्यात आपण आम्हास खूप काही शिकवले... 
सर्वात महत्वाचे म्हणजे १६ महिने पगार नसतानाही आपण निस्वार्थ पणे आपल्या कार्याला कसे वाहून घ्यावे हे आपण शिकविले नाहीतर आमच्या जागी दुसरा कोणी असता तर कधीच आत्महत्या करून मोकळा झाला असता.. 

आम्हाला आमचे अधिकारच माहित नव्हते एव्हाना आमच्यावर अन्याय झालाच तर कोणाला दाद मागायची हेही आम्हाला माहित नव्हते. आपण आम्हाला प्रत्येकाच्या म्हणजे AICTE, DTE, विद्यापिठ, समाजकल्याण, धर्मादाय आयुक्त, पोलीस स्टेशन इतकेच काय अगदी मंत्रालयातही जाण्यासाठी मजबूर केले. आणि बरं  झालं केलंत ते नाहीतर आम्ही आयुष्यात कधी एवढ्या साऱ्या विभागांना व मंत्र्यांना भेट दिली नसती.       


प्राद्यापकांना पोलिसांनी आपल्या गाडीतून पोलीस स्टेशन ला नेले
गुन्हा काय? - १६ महिन्याच्या पगारासाठी शांततेत आंदोलन केले.  
काल तर आमच्या काही प्राध्यापकांना पोलिसांनी आपल्या दारातून सरकारी वाहनातून पोलीस स्टेशन पर्यंत नेले. आपल्या या कार्यासाठी तर मला आपली मूर्ती बनवून आपल्या देव्हाऱ्यात ठेवावी असे वाटत आहे. विनाकारण काहीही कोणालाही त्रास दिला नसताना अन्यायाने जे  लोक स्वतःच त्रस्त झाले आहेत अश्या लोकांना पोलिसांनी पडकून नेण्यासारखे महान काम एकतर देव करू शकेल किंवा तुम्हीच (पुढच्या वेळी पोलिसांनी आम्हाला पकडून नेले तर आम्हाला येरवडा जेल मध्ये कमीत कमी १० दिवस ठेवायला सांगा. नाहीतर एरवी कोणताही गुन्हा करून आम्ही जेल मध्ये जाऊ असं काही वाटत नाही आम्हाला).
पोलीस गाडीतून उतरताना प्राध्यापक 
पण काही गोष्टी लोकांना का खटकत आहेत कोणास ठाऊक.. 
एवढे मोठे साम्राज्य निर्माण करण्यासाठी आपण किती खस्ता खाल्ल्यात याचा विचार न करता आपण १६ महिने पगार काय केला नाही तर सगळ्या प्राध्यापकांनी एवढे वैतागण्यासारखे काय आहे त्यात.

२५ वर्षे आपण आपल्या रक्ताचे पाणी करून हे सर्व उभारले मग थोडे रक्त आपल्या प्राध्यापकांचे थोडे विद्यार्थ्यांचे व थोडे पालकांचे रक्त शोषून पिलात तर एवढा कुठे काय तुम्ही गुन्हा केलात. सगळे संस्थाचालक  ते हेच करतात काही संस्थाचालक तर तुम्हालाच मार्गदर्शक मानून आपल्या पावलावर पाय टाकत आहेत. वेडे आहेत का ते लोक मग? आणि एवढ्या साऱ्या पैश्यांवर डल्ला मानून विजय मल्ल्या किंवा त्या निरव मोदी सारखे पळून न जाता इथेच सर्वांच्या नाकावर तिवंचून राहण्यासाठीची तल्लख बुद्धी आपल्या कडे आहे व आमच्याकडे नाही त्यात तुमची काय चुकी? 

आपण आमची काही काळजी करू नका सर..!
आम्ही आता उपोषण सुरु केले आहे त्यामुळे आमचा जेवणाचा खर्च पण वाचलाय. १६ महिने पगार होत नाही हे पाहून लोक दयेने आमच्याकडे पाहतात त्यामुळे घरमालक, दूधवाले, ट्राफिक पोलिसवाले आता आमच्याकडे पैसेही मागत नाहीत. उन्हा-तान्हात फिरून आमची स्किन थोडी टॅन झाली आहे इतकेच (पैसे आल्यानंतर आपण आपल्या फॅमिली ब्युटी पार्लर वाल्याकसून आम्हाला फेशिअल करून द्यावे एवढीच विनंती. तोपर्यंत आम्ही शेविंग देखील करत नाही. तेवढेच पैसे वाचतील.)   

बहुतेक वेळा आम्ही तुमच्याकडून ऐकले आहे की आपण सारे एकच फॅमिली आहोत. मग फॅमिली मधील 99 % लोकांनीच का नेहमी त्रास घ्यावा व मोजक्याच लोकांनी ऐषोआराम का करावा हे आमच्या मूर्ख आई-वडिलांना सांगूनही समजत नाही. त्यामुळे मी तर माझ्या घरी जाणेच बंद केले आहे. तीन दिवस सुट्टी आहे म्ह्णून घरी ये म्हणत आहे आई पण मला काम आहे म्हणून मी जायचे टाळले (उगाच पैसे खर्च नको म्ह्णून मी घरी येत नाही एवढी न समजण्याजोगी माझी आई आडाणी नाही तरीही). एवढे सांगूनही ऐकत नाहीत ते. उद्या येणार आहेत म्हणे भेटायला (पाहायला मी जिवंत आहे का ते). आणि उगाचच लहान असल्यासारखे आता गावाकडून भाजीपाला-धान्य आणि बरेच काही घेऊन येतील आता (जणू काही आता मी १६ महिने पगार नसल्याने उपाशी पोटी मारणार आहे कि काय असे त्यांना वाटत असेल)

असो. 
आपणाकडून अजून बरेच काही शिकायचे आहे. जितके शिकवलं तितके कमीच आहे. 
आपल्या प्राध्यापकाची प्रगती पाहून आपणाला आनंदच होत असेल असेल यात शंका नाही. 
ते म्हणतात ना  "प्रेसिडेंट सर - आज खुश तो बहोत होगे तुम ".. त्याप्रमाणे  
काळजी घ्या. (म्हणून आपल्या दारासमोर GET WELL SOON असे लिहून आलोय)

पुन्हा एकदा नमस्कार,

आपलेच लाडके 
सिंहगडचे प्राध्यापक